समर्थ विद्या मंदिरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांना अभिवादन
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील सांगळे गल्ली येथील समर्थ विद्या मंदिरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक अजय महाजन, बाळासाहेब वाव्हळ, संदिप पवार, पीपल्स हेल्पलाईनचे प्रकाश थोरात, संजय मांडलिक, महेश परदेशी, संगिता पारखे, सुनिता किंबहुणे, हेमलता शिंदे, सविता डहाळे आदींसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
मुख्याध्यापक अजय महाजन म्हणाले की, अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळकांनी समाज जागृतीचे महान कार्य केले. अण्णाभाऊ साठे केवल लोकशाहीर नव्हे, तर ते दर्जेदार साहित्यिक होते. त्यांनी आपल्या साहित्यातून जनजागृतीचे कार्य केले. तसेच लोकमान्य टिळकांनी देखील समाजबांधवांना एकत्रित करुन वृत्तपत्राच्या माध्यमातून समाजात जागृती निर्माण केल्याचे त्यांनी सांगितले.
प्रकाश थोरात म्हणाले की, दिड दिवसाची शाळा शिकून अण्णाभाऊ साठे यांनी उत्कृष्ट साहित्य निर्मिती केली. आपल्या साहित्यातून त्यांनी वंचित, दीन-दुबळ्यांचा आवाज बुलंद केला. स्वातंत्र्य चळवळीत लोकमान्य टिळकांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तर संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात अण्णाभाऊंचे नांव अग्रक्रमाने घेतले जाते. या महापुरुषांनी केलेली लोकजागृती प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.